Tuesday, 5 March 2024

महिलांचे आर्थिक स्वावलंबन हाच राष्ट्रीय विकासाचा महामार्ग

 गावाकडे जाण्याचा संदेश महात्मा गांधींनी अनेक वर्षांपूर्वी दिला. कारण भारत हा मूळ खेड्यात असलेला देश असून खेड्याचा विकास हा खऱ्या अर्थाने भारताचा विकास आहे, खरं म्हणजे खेड्याचा विकास झाला तरच आधुनिक भारत विकासाच्या खऱ्या पायऱ्या पार करेल. जशी एक शिक्षित आई पूर्ण घरचा विकास करू शकते तसेच खेड्या खेड्यांमधून होणारा महिलांचा विकास हा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.
 आजच्या काळात खेड्यातील किंवा शहरातील महिलांचा विकास सर्वतोपरी होणे अत्यावश्यक आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. सामाजिक, राजकीय ,वैद्यकीय, संशोधन ,शैक्षणिक, राष्ट्रीय,  आंतरराष्ट्रीय क्षेत्र असो ती या क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवीत आहे .ग्रामीण भागातील महिला आजच्या घडीला शहरी भागातील महिलांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा जास्त हिरेरीने काम करताना दिसत आहे. या महिला आपल्या आर्थिक विवेचनेचा प्रश्न सोडवताना अनेक आर्थिक समस्येच्या प्रश्नावर मात करून एक वेगळा दृष्टांत समाजासमोर ठेवला आहे .ग्रामीण महिला आर्थिक सक्षमही करण्याचे धडे घेऊन स्वतःला सक्षम बनवण्याची ध्येय समोर ठेवून आधुनिक शेतीच्या माध्यमातून, लघु उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा निर्माण करताना दिसत आहेत .चूल आणि मूल तत्त्वाला बाजूला सारून ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाकडे वळत आहेत .शेती ,शिक्षण, वैद्यकीय, बचत गट, राजकारण अशा अनेक क्षेत्रात महिलांची वाटचाल साक्ष देताना दिसते. ग्रामीण भागातील महिला या लघु उद्योगाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या एकेक टप्पा पार करत आहेत. ग्रामीण महिला शेतीच्या कार्याबरोबरच शेतीविषयक कामाचा कार्यभार उत्तम पद्धतीने करतात जसे शेतीतील मजुरांचा हिशोब ,मजुरी, आठवड्याचा बाजार ,शेतीच्या कामाचा ताळेबंद, हिशोब या कामाबरोबरच मुलांच्या शैक्षणिक गरजा ,घरातील आर्थिक कामकाजाचा हिशोब ,ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडते. ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत त्यातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे महिला बचत गट या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना माफक तरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्यामुळे ग्रामीण महिला शशक्त व आत्मनिर्भर बनवले जाते .बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या सोयीनुसार लघुउद्योग सुरू करून आपला आर्थिक विकास साध्य करतात आणि या योजना ग्रामीण महिलांना सक्षम बनवते .महिला बचत गट कर्ज योजना ही वरदानच ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून लघुउद्योग सुरू करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील जेणेकरून नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांना रोजगार‌ मिळेल बेरोजगार महिलांना स्वतःच्या घरापासून दूर शहरात जाण्याची गरज पडणार नाही. परिणामी नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या चर्चात होणारे स्थलांतर थांबेल. महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून इच्छुक महिला स्वतःचा उद्योग सुरू करून सामाजिक दृष्ट्या सुद्धा ती सक्षम बनेल तसेच अशा महिलांना पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्या स्वतः स्वावलंबी बनतील जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल म्हणून महिलाही सर्वांगीण दृष्ट सक्षम बनली तरच आपल्या कुटुंबाचा तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाचा चांगल्या पद्धतीने निर्वाह करेल . हे खऱ्या अर्थाने महिलांच्या एकूणच सामाजिक उत्थानामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीने वापरली जाणारी संकल्पना. परंतु अलीकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत महिलांना खऱ्या अर्थाने सर्वच बाबतीत स्वावलंबन प्राप्त झालेआहे असे म्हणता येत नव्हतं. आजही काही बाबतीत हे लागू पडतं. मात्र अलीकडे सर्वच सामाजिक प्रवर्गात सुरू असलेली एक चळवळ जिला आपण बचत गट म्हणतो त्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी बनत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 
वास्तविक बचत ही महिलांची मूळ प्रवर्ति, मात्र ही बचत कधी पदराच्या गाठीच्या स्वरूपात, तर कधी डाळी डुळी, उतरंडीच्या कुठल्यातरी अन्नधान्याच्या कप्प्यात पडलेली असायची. ती घरच्याच अडचणीच्या वेळी बाहेर निघायची. मात्र अशा बचतीचा कुटुंबाला आधार नेहमीच होत आला आहे. अशा बचतीला बँकांच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्याचा विचार जागतिक पातळीवर सुरू होऊन तो सर्वप्रथम बांगलादेशात डॉ. मोहम्मद युनूस या नोबेल पुरस्कार विजेत्यांनी रुजवला. त्यानंतर हा विचार भारतातील महिलांच्या बाबतीत बरोबर उपयोगात आणता येऊ शकतो या विचाराने 1991 पासून भारतात सुद्धा बचत गट चळवळीला प्रारंभ झाला. भारताच्या ग्रामीण भागाचं आर्थिक चित्र हे सावकारी पाशातून पुढे जातं साकारत. त्यामुळे सावकाराच्या जोखडातून कुटुंबाची सोडवणूक करायची असेल तर महिलांना आर्थिक उत्पन्नाच्या साधनांची जोड देऊन आर्थिक सक्षम केलं पाहिजे हा विचार पुढे आला आणि त्यातूनच भारताच्या वेगवेगळ्या राज्यात महिला बचत गटांची एक स्वतंत्र चळवळ उभी राहिली. त्यातून आर्थिक समृद्धीची वाटचाल सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. आज देशातल्या अनेक प्रदेशातील बचत गटांनी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ख्याती मिळवली आहे. महाराष्ट्रातले बचत गट देखील त्यात मागे नाहीत. बचत गट म्हणजेच आर्थिक स्वावलंबन, आर्थिक साक्षरता, आर्थिक आत्मनिर्भरता ,उद्योजकता आणि आपल्यातील सुप्त गुणांना वाव ,संधी देत आपण आपल्यासह समाज आणि देशाच्या उन्नती मध्ये, देशाच्या एकंदरीत उत्पन्न वाढीमध्ये ,दरडोई उत्पन्नात भर टाकत बचत गट दैदीप्यमान कार्य करत आहेत. यातल्या काही बचत गटाची उदाहरणे तर खूपच महत्त्वपूर्ण योगदान देण्यारी आहेत. महाराष्ट्रातल्याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडीतील मानकर वाडीतल्या केवळ 400 लोकसंख्या असणाऱ्या गावाने बचतगटांच्या माध्यमातून संपूर्ण कायापालट करून दाखवला, तर अक्कलकोट तालुक्यातल्या जीवन ज्योती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादित करून त्यांचं वितरण व उत्पादन संपूर्ण राज्यभर नव्हे तर आता देशातल्या अनेक प्रदेशात सुरू केलेला आहे. त्यात हिमाचल प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम, छत्तीसगड, बिहार सारख्या राज्यात या महिला बचत गटांनी आपली उत्पादन केंद्रे सुरू केली आहेत. खानदेशातील महिला बचत गटांनी तर मक्याच्या पिठापासून सुंदर कलाकृती तयार करणे आणि साता समुद्रा पार भारतमाता अर्थात गोधडी बचत गटाच्या माध्यमातूनच पोहोचवली आहे. शिवाय लातूर सारख्या शहरात सुद्धा महिला बचत गटाच्या माध्यमातून अतिशय निम्न स्वरूपाचं कार्य असणाऱ्या सेफ्टी टॅंक स्वच्छता करण्यासाठी यांत्रिक उपकरण उपलब्ध करून दिली आहेत. म्हणजेच नेहमी कुरडया- पापड्या - मसाले यासारख्या पारंपारिक वस्तूच्या उत्पादनात अडकलेली महिला आता बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक कमावत आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून महिला खरोखरच सक्षम होत आहेत का? आर्थिक स्वावलंबी होत आहेत का? याबाबतीत निकिता नावऱिया आणि डॉ. प्रीती रॉय यांनी संशोधन केला आहे. त्यातून महिला बचत गटामध्ये सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या महिलांचा वयोगट हा 30 ते 40 मधील आहे. यावरून आपण  युवती वैवाहिक जीवनात प्रवेश करून वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करताना बचत गटाच्या माध्यमातून जोडली जाते हे सिद्ध होते. त्यामुळे गृहिणी, नवउद्योजक आणि रोजगार करणारी महिला सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून जोडली जाते, हे महिलांच्या होणाऱ्या आर्थिक  सक्षमीकरणासोबत स्वावलंबनाच्या बाबतीत देखील उल्लेखनीय कार्य म्हणावे लागेल. वास्तविक पाहता महिला बचत गटांना आर्थिक ताकद पाठबळ देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून होत आहे. बचत गटांना त्यांनी बचत केलेल्या रकमेपेक्षाही कितीतरी पटीने अधिक आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून, बँकांच्या मध्यस्थीतून उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे महिलांचा सहभाग आणि महिलांची परस्पर विश्वासार्हता अधिक दृढ होत आहे. काही महिलांनी तर डॉ. प्रीती राय यांना दिलेल्या उत्तरात बचत गटाने आमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे मान्य केले आहे. म्हणजेच बचत गट ही केवळ शिकून सवरून पदवी ग्रहण केलेली महिला ही जशी आर्थिक सक्षम नसते तसं बचत गट सुरू करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त होत नाही तर त्यासाठी महिलांनी महिलांवर ठेवलेल्या विश्वासाच्या बळावर आणि दिलेल्या हरतऱ्हेचे योगदानामुळं बचत गटांना यश प्राप्त होत आहे. शिवाय करोडो रुपयांची उलाढाल शासकीय माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या प्रदर्शने, शिबिरे, विक्रीचे स्टॉल या माध्यमातून होतेय. यातून महिला आर्थिक स्वावलंबी बनत असल्याचे आशादायी चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. आता ग्रामीण महिला सुद्धा घरातील आर्थिक व्यवहारात पुरुषांच्याही पुढे जाऊन आपले विचार मांडत असल्याचं चित्र ग्रामीण भागातून पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातल्या महिलांचे शिक्षण जरी कमी असले तरी त्या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर निश्चित बनल्या आहेत अस आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो.
डॉ वनिता आग्रे पटवारी 
लातूर 

प्रत्येकाला शुभ्रा हवी

 मानवी अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात उमटणाऱ्या अल्पकालीन आणि दीर्घकालिक घटनांचे सात पडसाद हे त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतात आणि हेच प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनाला कधी उच्च पातळीवर तर घेऊन जातात तर कधी फरफटत घेऊन जातात. हेच उन्हातलं चांदणं या नाटकातून आम्हाला पाहायला मिळतं. तसं पाहता ज्येष्ठ नाट्यकर्मी, कलावंत अॅड शैलेश गोजमगुंडे यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं उन्हातलं चांदणं हे नाटक नुकतच पाहण्यात आल त्याच्या विषयी चार शब्द. नाटकातून शरद नावाच्या भावनाशील कवीचं (तसं कवी हे भावनिकच असतात म्हणा) संसारिक जीवन त्या संसारिक जीवनातली जोडीदारीन पांढरपेशा समाजात वावरणारी शरद ची बायको तारा जी नको तितका हव्यास बाळगून नवऱ्याशी अर्थात कवी शरद यांच्याशी शुल्लक  गोष्टीवरून टोकापर्यंत जाते आणि त्यातच हळव्या मनाचा शरद कुठेतरी दुखावला जात असतो. 
नाटकातील छोट्या छोट्या घटना आणि प्रसंगावरून  कवी शरद हा चित्रविचित्र अवस्थेत सापडून पत्नीच्या मानसिक छळवादाला कंटाळून कुठेतरी स्वप्नांच्या दुनियेत हरवून ते कधीही न मिळालेले प्रेम शुभ्राच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न ताराच्या नकारात्मक वर्तनाच्या अनुषंगाने त्याच्या आंतरपटलावर निर्माण झालेला असतो. 
अंतर्मनावर बिंबलेली कवी मनाची भावनिकता ताराच्या अंगी लवलेशही दिसून येत नाही. उलट भोळ्या शरदला ताराच हे वर्तन शुभ्राच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतं. दुसरीकडे शुभ्राला शरदच्या कविता अत्याधिक आवडतात आणि ती त्याला अधिकाधिक कविता लिहिण्याला प्रेरित करते. दोन व्यक्ती रेखांमध्ये एक शरदच्या कविता बनून कवितेत उतरते तर दुसरी तारा कवितेचा दुष्वास करते,शरदच्या कविता फाडून टाकते. ताराच हे वर्तन शरदच्या अंतर्मनाला चिरफाटून टाकतं तो अंतर्मनातून हेलावून जातो आणि जिला शुभ्रा समजून विवाहपूर्वी प्रेम करत होता तोच विवाह नंतर ताराचा तो प्रचंड तिरस्कार करू लागतो. ताराचा तिरस्कार करताना तो शुभ्राच्या प्रेमात पडला आणि शेवटी शुभ्रा शिवाय त्याची कविता आणि त्याचे जीवन अधुरं वाटू लागलं. 
त्याच्या या अशा वागण्याचा ताराच्या मनावर परिणाम झाला आणि ती या बदला  संदर्भात गंभीर विचार करते. या दोघांच्या संसारामध्ये असणारा तिसरा घटक  सायक्राॅटिस्ट  ताराला आणि शरदला त्यांच्यात निर्माण होणाऱ्या दुराव्याबद्दल वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देतो. मात्र दोघेही आपापल्या बाजूने योग्य असल्याचं भासवतात. तरीदेखील या ठिकाणी एक गोष्ट कायम लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे पती-पत्नीमध्ये होणारी भांडणं ही जर अल्पकालीन असतील  तर आपल्याला या नाटकाचा शेवट वेगळा पाहायला मिळाला असता परंतु शरदच्या मनात आपल्याविषयी प्रेमळ भावना निर्माण व्हाव्यात यासाठी शुभ्रा बनणारी तारा शेवटी स्वतःला संपवून शुभ्रा म्हणून राहण्यासाठी सुद्धा तयार होते. मात्र ताराच्या मनात असलेली पांढऱपेशी समाजातले हव्यास शुभ्रा बनली तरी गेलेले नसतात. इथेच तिची चूक होते आणि शरद शेवटी ताराला संपवतो. आणि शुभ्राच्या मिठीत बेधुंद कविता करत राहतो.
या नाटकाच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शकांनी आधुनिक काळातील कुटुंब व्यवस्थेत  टोकाच्या भूमिकेतून ज्या समस्या आणि प्रश्नांचा डोंगर समाजापुढे उभा राहतोय त्याची झलक दाखवण्यात यशस्वी झालेले आहेत. नाटकात इनमिन चार पात्र परंतु चारही पात्र तेवढ्याच तोलामोलाची तेवढ्याच समर्थपणे आणि एकमेकांच्या पात्राला अधिकाधिक खुलवणारी दिसून येतात. शुभ्रा ही कल्पना अर्थात भासमानच आहे. 
तारा हे वास्तव आहे. सुरुवातीला कठोर व व्यावहारीक असलेल्या ताराला, शरद मनोरुग्ण झाल्यानंतर व जयंत ने जाणवून दिल्यानंतर त्याचं प्रेम समजतं. तिचंही शरदवर प्रेम आहेच. मात्र व्यावहारीक अपेक्षांच्या ओझ्याखाली ते लपलेलं होतं. एका भावनिक क्षणी तिला स्वतःचीच घृणा  येते. ती शरदला ते बोलून दाखवते. मात्र शरदच्या मनःपटलावरुन तारा कधीच गायब झालेली असते. तिची साधी आठवण सुद्धा त्याला अस्वस्थ करुन जाते.हीच गोष्ट भावनेच्या भर‍ात तारा विसरते आणि ती शरदला मी तारा असल्याचं सांगते. इथेच ताराचा घात होतो. आणि ताराला शरद संपवतो.
 केवळ दोन अंकात नाटक संपत परंतु बदललेल्या स्थितीच भान मात्र रसिकांच्या मनात खोलवर बिंबवतं. 
शुभ्राच अस्तित्व हे जरी भासमान असलं तरी ताराच्या टोकाच्या भूमिकेमुळे ते वास्तववादी दिसतं म्हणून तारा स्वतःचा अस्तित्व संपवून शरदच्या जीवनात पुन्हा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करते परंतु त्यासाठी बराच वेळ गेलेला असतो म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हे महत्त्वाचे ठरतात. 
लेखक दिग्दर्शक :अॅड शैलेश गोजमुंडे
प्रकाश योजना: सुधीर राजहंस
 नेपथ्य :अॅड बालाजी मेहेत्रे निशिकांत जोशी 
संगीत :तनमय रोडगे विनायक राठोड निलेश पाठक रंगभूषा /वेशभूषा :सचिन उपाध्ये स्मिता उपाध्ये आणि कलाकार :प्रा. नवलाजी जाधव डॉ. स्वप्नाजा यादव, अभिषेक शिंदे, प्रज्ञा मुळे, पृथ्वी सिंह चव्हाण, आलोक वलाकट्टे आणि अड शैलेश गोजमगुंडे.