Thursday, 6 June 2024

लोकसभा निवडणूक निकाल 24 चा अन्वयार्थ

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 पार पडून 4 जून रोजी निकाल घोषित करण्यात आला. निकालानंतर राष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या घटकांकडून, वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून, विश्लेषकांकडून, सामान्य माणसांकडून व्यक्त करण्यात आल्या त्यात विपर्यास मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मुळात या निवडणुका वादाच्या पार्श्वभूमीवरच सुरू झालेल्या होत्या. निवडणूक आयोगाने देखील या निवडणुकांच्या तारखा ,सात टप्प्यातील आणि लगभग दोन महिन्यापेक्षा अधिक कालखंडात चाललेल्या निवडणुका वादाच्या ठरल्या नसत्या तर नवलच. एकीकडे प्रचंड उष्णता आणि त्यात राजकीय पक्षांची कमरेखालची आरोप - प्रत्यारोपाची भाषा त्यामुळे समाजमन या दोन महिन्याच्या कालावधीत अताताई राजकारणाला निश्चितपणे उबगला असेल. सामान्य माणसाला कदाचित वाईट देखील वाटत असेल. त्याच्या हितापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या असंच जणू काही चित्र या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दिसून येत होत. 
निकाल घोषित झाला निकालानंतर जो तो आप-आपल्या परीने आनंद व्यक्त करतोय. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे ईव्हीएम यंत्राबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने आपली तक्रार केली नाही. ही बाब निवडणूक आयोग आणि त्या यंत्राच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करणारी ठरते. त्यामुळे इथून पुढे आपल्या पराभवाचे ईव्हीएमवर  कोणीही खापर  फोडणार नाही ही एक जमेची बाजू या निवडणुकीतून आपल्याला पाहायला मिळते. 
निवडणुकीच्या निकालानंतर ज्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यात नरेंद्र मोदींचा पराभव, नरेंद्र मोदींच्या विचारांचा पराभव, नरेंद्र मोदीच्या हुकूमशाही विचाराला लगाम अशा प्रकारची वक्तव्य एकीकडे तर दुसरीकडे काँग्रेस भक्कम स्थितीत पोहोचली, समाजवादी पक्षाने आपले अस्तित्व निर्माण केले, चंद्रबाबू नायडू ने पुन्हा फिनिक्स प्रमाणे झेप घेतली, भारतीय जनता पक्षाने दक्षिणेत आपले झेंडे रोवले, ममता बॅनर्जी ने पुन्हा पश्चिम बंगाल वरचे आपले वर्चस्व दाखवून दिले, तर उत्तर प्रदेशने त्यातल्या त्यात आयोध्या नगरीने आणि परिसराने भाजपला रामाच्या नावानेच नाकारले गेल्याच्या चर्चा सर्वत्रच ऐकायला मिळत आहेत. 
महाराष्ट्रातलं राजकारण तर पूर्णपणे ढवळून निघाल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून सुरू असलेल्या रणसंग्राम महाराष्ट्रातल्या राजकारणाला विटाळ लावणारा ठरला होता. दोन राजकीय पक्ष फोडणे आणि प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना आपल्या पक्षात घेणे, बरोबरीने ठेवणे हे किती महागात पडू शकतं हा देखील या निवडणुकीच्या निकालाचा अर्थ आपण लावू शकतो आणि म्हणून भावना, विचार, पक्ष या गोष्टी प्रसंगाप्रमाणे मतदारावर लागू पडतात. महाराष्ट्रातच नाहीतरी संपूर्ण भारतात बंडखोरी यापूर्वी देखील झालेली आहे मात्र त्याचे परिणाम त्या त्या वेळेला दिसून आले. नंतर मात्र सर्व काही सुरळीत असे चित्र पाहायला मिळत. पण महाराष्ट्रातल्या राजकारणात हे चित्र पूर्णपणे विस्कटून गेलेले पाहायला मिळते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाला भविष्यात या निकालामुळे कलाटणी मिळण्याची शकण्याची शक्यता आहे 
या निकालाचा दुसरा अन्वयार्थ देशातल्या लोकशाही व्यवस्थेतील विरोधी पक्षाला असलेली महत्त्वाची भूमिका. मागच्या दहा वर्षात देशात कणखर नेतृत्व असणारा विरोधी पक्षच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मोदी हुकुमशासारखं वागत असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेली होती. परिणामी मोदींना मतदारांनी धडा शिकवला अशी भाषा विरोधक करू लागले आहेत. याचा विचार करता मतदारांनी 55% म्हणजेच 240 जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिल्याने मोदींच्या ध्येय धोरणाला, कार्यक्रमाला केवळ 50% लोकांचा पाठिंबा असल्याचा अर्थ देखील आपणास काढता येऊ शकतो.  नरेंद्र मोदींना 3.0 मधील आपल्या सरकारचं अस्तित्व पुन्हा एकदा नव्याने एनडीए च्या सहकार्यांसोबत चालवावं लागणार  आहे. त्यामुळे एक मुखी निर्णय, एक मुखी अंमलबजावणी या धोरणाला आता खीळ बसणार आहे. त्याची सुरुवात बिहार मधील जनता दलाच्या वतीने केलेल्या वेगवेगळ्या निर्णयांच्या बाबतीत पुनर्विचार करण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन करून केली आहे. तर दुसरीकडे चंद्रबाबू नायडू यांनी वेगवेगळी महत्त्वाचे खाते मागून भारतीय जनता पार्टीचे तिसऱ्या टप्प्यातील सरकार हे काटेरी वाटेवर चालणारे आणि दोरीवरची कसरत करणारे ठरणार यात शंका नाही. त्यामुळेच काँग्रेसचे मलिकार्जुन खरगे यांनी आज आम्ही घाई गडबड न करता योग्य संधी आणि वेळेची वाट पाहू आणि सत्ता स्थापनेचा दावा करू हे केलेले विधान म्हणजेच भविष्यात एनडीए मध्ये निर्णयाच्या, अंमलबजावणीच्या वरून मतभेद निर्माण होऊ शकतात आणि त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळू शकतो हा आशावाद  खरा की खोटा ठरणार हे भविष्यात कळू शकेल. 
निवडणुकीतून चांगले, वाईट, सुशिक्षित, महिला आणि त्याचबरोबर देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या दोघांना संसदेवर निवडून जाण्याचा संधी मिळाले. म्त्यामुळे निवडणुकीचा आणखीन एक अन्वयार्थ काढताना मतदाराने नेमक्या कोणत्या व्यक्तीला आपलं नेतृत्व सोपवावं याचा विचार अजूनही समाजात तितका खोलवर रुजलेला नाही हे दिसून येतं. समाजात आजही साम-दाम, दंड, भेद, जात, धर्म, पंथ, भाषा याचा आधार निवडणुकांमध्ये घेतला जातो आणि त्यातून कुरघोडी  करण्याचे प्रयत्न होतात नव्हे त्याचीच समीकरणे बसवण्याचा प्रयत्न होतो. हे देखील महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या आणि अनेक मतदारसंघातील निकालांनी सुद्धा दाखवून दिलेल आहे. जातीची समीकरण, राज्यातील आंदोलने, शेतकऱ्यांचे कांदा, सोयाबीन नुकसान भरपाई, पिक विमा सारखे प्रश्न  राज्यात होत असलेल्या विविध आरक्षण समर्थनातील आंदोलने यांचाही या निवडणुकीवर प्रचंड प्रभाव पडलेला दिसतो. म्हणून निकालाने आम्हाला हा देखील विचार करायला भाग पडले आहे. म्हणून निकालानंतर प्रत्येक जण आनंदी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. असं क्वचित वेळा घडतं आणि हे 2024 च्या निवडणुकांनी आपल्याला दाखवून दिलं कितीही आरोप प्रत्यारोप झाले, कितीही विकासात्मक योजना राबवल्या तरी अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून निकालाकडे पाहणं हे अत्यावश्यक ठरतं.  2024 चा निकाल केवळ भारतीय जनता पार्टीला दिलेला धक्का नसून तो त्यांच्यासोबत असणाऱ्या घटक पक्षांना देखील तो देण्यात आलेला आहे. इंडिया आघाडीने केवळ मोदी विरोध न करता काही स्थानिक व विकासात्मक मुद्दे घेऊन या निवडणुकीत आपला फोकस केलेला असल्यामुळे त्यांना हे यश संपादन करता आले.  देशातल्या प्रत्येकालाच निवडणूक निकालाचे वेगवेगळे पैलू पाहता येऊ शकतात
प्रा पटवारी शिवशंकर लातूर 
मुक्त पत्रकार 

Thursday, 9 May 2024

महात्मा बसवेश्वरांचे विचार सामाजिक समरसते कडे घेऊन जाणारे

आजपर्यंत होऊन गेलेल्या संताचे, महापुरुषांचे विचार हे समाजात फूट पाडण्यासाठी व्यक्त केलेले नसून, समाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि भाषिक समरसता अधिकाधिक प्वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने संर्वकश विचाराच्या अंतिम टप्प्यावर मांडलेले असल्याने ते आपणास कित्येक वर्षानंतरही आजच्या काळाला लागू पडतात असे वाटते. त्या पाठीमागचे मुख्य कारण म्हणजे संत, महात्म्यानीं, विचारवंतांनी आपले विचार मांडताना केवळ कोणत्याही एका बाजूचा, एकांगी विचार न करता समाजभान ठेवून सामाजिक कसोटीवर धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कसोटीवर हे अधिकाधिक भक्कमपणे कसे मार्गदर्शक बनतील याचा प्रामाणिकपणे विचार करून हे मांडलेले असल्याने, आपणास ते प्रासंगिक वाटणं स्वाभाविक होय. अशाच प्रकारे बाराव्या शतकात वीरशैव  लिंगायत धर्माच्या शैव पंथी मार्गाने चालणारा आणि बहुअंशी जातीपाती, धर्म, कर्मकांडाची बंधन जुगारून एक सुदृढ सामाजिक रचनेचा पाया घालणारा विचार ज्यांनी मांडला ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर होय. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या असंख्य वैचारिक आलेखातून काही पैलूंवर प्रकाश पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे.
जेव्हा- जेव्हा समाजात सामान्यांचे जगणं असहाय्य होऊन बसते अशा वेळेला त्या- त्या कालखंडात बुरसटलेल्या विचारसरणीला छेद देण्याचे त्या त्या कालखंडात प्रयत्न केले आहेत. तसाच प्रयत्न समाजातल्या अनिष्ट प्रथांना फाटा देऊन सामान्यांचा जगणं सुसहाय्य करण्याचा प्रयत्न आणि समाजातील अर्ध्या घटकाला महिलांना समान हक्क प्रदान करण्याचा विचार देऊन परिवर्तनवादी विचार समाजाला प्रदान केले. समाजात एक नव प्रवाह यानिमित्ताने सुरू झाला. भारताची संस्कृती वैभवशाली परंपरेच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे, पण त्यात वेळप्रसंगी काही चुकीच्या गोष्टींना देखील दूर सारण्याचा त्या त्या कालखंडात झालेला प्रयत्न हा खूपच महत्त्वाचा वाटतो. म्हणून समाज जीवनामध्ये परिवर्तन येत असतात आणि ही परिवर्तने समाजाला निश्चितपणे विकासात्मक दिशेनं घेऊन जाणारी असली तर त्या समाजाचा पाया आणि वैचारिक प्रगल्भता ही साहजिकच इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी वाटते. महात्मा बसवेश्वरांनी केलेल्या सामाजिक जाणीवा, प्रयत्नांचा आलेख हा सर्वच बाबतीत चढत गेलेला दिसतो. शोषण विरोधी, भेदभाव विरोधी, जातीभेद विरोधी मांडलेले विचार आजही आम्हाला समाजात तितकेच प्रासंगिक वाटतात. कारण समाजात आजही हे प्रश्न आम्हाला अनुभवायला येतात. त्यांच्या तो त्या कालखंडात मांडलेला विचार हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच मानला गेला पाहिजे. 
श्रमाची प्रतिष्ठा वाढवत नेऊन मानवी जीवनाचा विकास निश्चित मानला पाहिजे म्हणून 
कायक वे कैलास 
हा मूलमंत्र त्यांनी प्रदान केला. समाज बांधवांच्या मनात ईश्वर प्राप्तीसाठी होत असलेली पिळवणूक, श्रद्धा यांचा विचारही त्यांनी निश्चितपणे केला असावा. सर्वप्रथम चातुर्वर्ण्य व्यवसथेला कडाडून विरोध करत एक नवा समाज रचनेचा विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडला. वाचोनी शेकडो वेळा, 
ऐकूनही शेकडो वेळा, होणार काय 
आशा सुटेना रोष जाईना, 
अभिषेक करून फल काय? 
बोले तैसे नाही मन असा
 तो वाऱ्यांशी पाहून हसे 
आमचा कुडलसंगमदेवा 
 महात्मा बसवेश्वर हे केवळ विचार मांडून थांबणाऱ्यांपैकी नव्हते तर त्यांनी अनेक गोष्टी प्रत्यक्ष करून दाखवल्या. ते तत्त्वज्ञ तर होतेच पण कृतिशील होते तत्त्वाला, विचाराला कृतीची जोड होती. म्हणून त्यांचे विचार सामान्यांना देखील पटू लागले होते. प्रस्थापित समाज रचनेला, त्यांनी मांडलेले हे विचार साहजिकच पटणारे आणि पेलवणारे नव्हते. म्हणून सामाजिक समतेचा विचार समाजात प्रस्थापित होऊ देण्यास प्रस्थापित समाज व्यवस्थेतल्या अनेक घटकांनी विरोध केला. त्यांचा विचार हा कोणा एका व्यक्तीच्या विरोधातला नव्हता तर अनेकांनी मिळून तयार केलेल्या समाज रचनेच्या बाबतीत होता. ज्यामुळे सामान्यांचे जगणं असहाय्य बनलं होतं. समाज रुढी, प्रथा, परंपरा, बंधनं, जातीभेद, वर्णभेद सारख्या असंख्य कुप्रथामध्ये  साखळदंडाने जोखडलेला होता. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रचंड माहिती आणि ज्ञान मिळवत समाजाला जो भोळा -भाबडा होता त्याला या जोखडातून सोडवण्यासाठी वैचारिक घन घातले. त्यांनी केलेल्या अध्यात्म साधनेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळं पण प्राप्त झालं आणि ते वेगळेपण मानवतेच्या समस्त उन्नतीसाठी लोकांच्या सुखदुःखाशी समरस होत सामाजिक व्यवस्था अधिक दृढ होऊन धार्मिक, सांस्कृतिक समरसता वाढावी यासाठी प्रयत्नशील होत. स्त्री पुरुष भेदाला तर त्यांनी पहिल्या दिवसापासूनच छेद देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी ज्यांना ज्यांना सोबत घेतलं त्यात त्या कालखंडातल्या दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. हा महात्मा बसवेश्वरांच्या कार्यात्मक भागाचा परिणाम म्हणावा लागेल. कर्मकांडात अडकलेल्या समाजाला ते म्हणत
 दुग्ध हे उद्दिष्ट तथा वासराचे 
पाणी ते मत्स्याचे उद्दिष्टच 
पुष्प ते उद्दिष्ट तथा भ्रमराचे 
साधन पूजेचे काय सांगा? 
या त्यांच्या सरळ साध्या सोप्या वर्णनातून जी पूजा कर्मकांड केले जात होती ती सुद्धा शुद्ध नाहीत हा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पुरोहितांना आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा धर्म पालन करण्यास सांगणाऱ्या व्यवस्थेचा कडाडून विरोध करण्यामध्ये बसवेश्वरांचा आग्रणी होय. माणसाला जन्माने किंवा व्यवसायाने येणारी श्रेष्ठता किंवा कनिष्ठता ही कधीही मान्य नव्हती. म्हणून त्यांनी व्यवसायावरून किंवा जन्मावरून लादली जाणारी व्यवस्था नाकारून अर्थात ब्राह्मण्य व्यवस्थेला नाकारून या सर्व ब्राह्मण्यवस्थेने नाकारलेल्या समाजातील विविध  घटकांची मोट बांधून एकत्र करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना साध्या सरळ सोप्या भक्तिमार्गाने मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगितला. तसे पाहता महात्मा बसवेश्वरांचे विचार हे आधुनिक भारताच्या उभारणीसाठी 12 व्या शतकात केलेली पायाभरणीच म्हणावी लागेल. त्याच दृष्टीने भारतीय राज्यघटनेत असलेल्या मानवाधिकाराच्या बाबी या महात्मा बसवेश्वरांनी  मांडलेल्या अनेक वचनातून आपल्याला अनुभवता येते. कायक वे कैलास या संकल्पनेतून कोणत्याही व्यक्तीच्या कर्माला कमी जास्त लेखता येत नाही हा विचार मूळ लोकशाही तत्त्वांशी सुसंगत असल्याने तो आम्हाला अधिक भावतो. त्यांचे हे तत्व वैश्विक मानव जातीच्या उत्थानासाठी देखील लागू पडते. महात्मा बसवंनांनी व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्याचा ऑटोकाट प्रयत्न केला. एकांताकडून लोकांताकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, बहुदेव तत्वाकडून एकेश्वर वादाकडे  जाणारे आहेत. ऐतखाऊ वृत्ती कडून कायकवादाकडे, विषमतेकडून समानतेकडे, शिवलिंगाकडून इस्टलिंगाकडे अशा पद्धतीने त्यांनी समाज रचनेची दिशा ठरवली होती. त्यांचा हा विचार बाराव्या शतकातल्या तत्कालीन समाज व्यवस्थेला मान्य होणे कदापि शक्य नव्हते. ते धर्मचिंतक तर होतेच परंतु त्याच बरोबर सामाजिक सुधारणांचे प्रणेते होते असं देखील आपल्याला म्हणावं लागेल. 
दगडाचा देव देव नव्हे 
मातीचा देव नव्हे 
वृक्षदेव देव नव्हे 
देव तुमच्या अंतर्यामी 
हे कुडलसंगम देवा 
म्हणजेच समाजाला प्रतिकात्मक पूजा, संस्कृती, संस्कार यासारख्या गोष्टींमध्ये अडकून ठेवण्यामध्ये जे स्वतःला धन्य मानत  त्याच्यावर बसवन्नाने प्रचंड प्रहार केला. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा इतिहास तसा खूप मोठा व्यापक विस्तृत असून त्यांच्या वचनांच्या माध्यमातून देशभरात मोठ्या क्रांतिकारी विचाराची ठिणगी पडली.ही ठिणगी पुढे धगधगत्या मशालीत रुपांतरीत होऊन समाज व्यवस्थेत धर्म जाती विरहित आणि कर्मकांड रहित विचाराला चालना मिळू लागले. हीच बाब आजही आमच्या प्रगत समाजाला तेवढीच लागू पडते जेवढी ती बाराव्या शतकात लागू पडत होती. आज आम्ही कितीही उच्च विद्या विभूषित झालो तरी महिलांच्या बाबतीत सन्मानाचे स्थान अजूनही घराघरातून प्राप्त होणे बाकी आहे. त्यासाठी आम्हाला कितीतरी कायदे नियम करावे लागतात. परंतु आम्ही त्याचं पालन करत नाही. महिलांच्या बाबतीत होणारे अत्याचार, अणाचार, दुराचार थांबवायचे असतील तर महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्याची मानसिकता विकसित करू शकलो तर ते खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वर यांना जन्मदिनाची अपूर्व भेट मानावे लागेल.
डॉ वनिता आग्रे पटवारी 
दयानंद कला महाविद्यालय, लातूर 

Tuesday, 5 March 2024

महिलांचे आर्थिक स्वावलंबन हाच राष्ट्रीय विकासाचा महामार्ग

 गावाकडे जाण्याचा संदेश महात्मा गांधींनी अनेक वर्षांपूर्वी दिला. कारण भारत हा मूळ खेड्यात असलेला देश असून खेड्याचा विकास हा खऱ्या अर्थाने भारताचा विकास आहे, खरं म्हणजे खेड्याचा विकास झाला तरच आधुनिक भारत विकासाच्या खऱ्या पायऱ्या पार करेल. जशी एक शिक्षित आई पूर्ण घरचा विकास करू शकते तसेच खेड्या खेड्यांमधून होणारा महिलांचा विकास हा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.
 आजच्या काळात खेड्यातील किंवा शहरातील महिलांचा विकास सर्वतोपरी होणे अत्यावश्यक आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. सामाजिक, राजकीय ,वैद्यकीय, संशोधन ,शैक्षणिक, राष्ट्रीय,  आंतरराष्ट्रीय क्षेत्र असो ती या क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवीत आहे .ग्रामीण भागातील महिला आजच्या घडीला शहरी भागातील महिलांच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा जास्त हिरेरीने काम करताना दिसत आहे. या महिला आपल्या आर्थिक विवेचनेचा प्रश्न सोडवताना अनेक आर्थिक समस्येच्या प्रश्नावर मात करून एक वेगळा दृष्टांत समाजासमोर ठेवला आहे .ग्रामीण महिला आर्थिक सक्षमही करण्याचे धडे घेऊन स्वतःला सक्षम बनवण्याची ध्येय समोर ठेवून आधुनिक शेतीच्या माध्यमातून, लघु उद्योगाच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा निर्माण करताना दिसत आहेत .चूल आणि मूल तत्त्वाला बाजूला सारून ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाकडे वळत आहेत .शेती ,शिक्षण, वैद्यकीय, बचत गट, राजकारण अशा अनेक क्षेत्रात महिलांची वाटचाल साक्ष देताना दिसते. ग्रामीण भागातील महिला या लघु उद्योगाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या एकेक टप्पा पार करत आहेत. ग्रामीण महिला शेतीच्या कार्याबरोबरच शेतीविषयक कामाचा कार्यभार उत्तम पद्धतीने करतात जसे शेतीतील मजुरांचा हिशोब ,मजुरी, आठवड्याचा बाजार ,शेतीच्या कामाचा ताळेबंद, हिशोब या कामाबरोबरच मुलांच्या शैक्षणिक गरजा ,घरातील आर्थिक कामकाजाचा हिशोब ,ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडते. ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत त्यातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे महिला बचत गट या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना माफक तरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्यामुळे ग्रामीण महिला शशक्त व आत्मनिर्भर बनवले जाते .बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या सोयीनुसार लघुउद्योग सुरू करून आपला आर्थिक विकास साध्य करतात आणि या योजना ग्रामीण महिलांना सक्षम बनवते .महिला बचत गट कर्ज योजना ही वरदानच ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून लघुउद्योग सुरू करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील जेणेकरून नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांना रोजगार‌ मिळेल बेरोजगार महिलांना स्वतःच्या घरापासून दूर शहरात जाण्याची गरज पडणार नाही. परिणामी नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या चर्चात होणारे स्थलांतर थांबेल. महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून इच्छुक महिला स्वतःचा उद्योग सुरू करून सामाजिक दृष्ट्या सुद्धा ती सक्षम बनेल तसेच अशा महिलांना पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्या स्वतः स्वावलंबी बनतील जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल म्हणून महिलाही सर्वांगीण दृष्ट सक्षम बनली तरच आपल्या कुटुंबाचा तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाचा चांगल्या पद्धतीने निर्वाह करेल . हे खऱ्या अर्थाने महिलांच्या एकूणच सामाजिक उत्थानामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीने वापरली जाणारी संकल्पना. परंतु अलीकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत महिलांना खऱ्या अर्थाने सर्वच बाबतीत स्वावलंबन प्राप्त झालेआहे असे म्हणता येत नव्हतं. आजही काही बाबतीत हे लागू पडतं. मात्र अलीकडे सर्वच सामाजिक प्रवर्गात सुरू असलेली एक चळवळ जिला आपण बचत गट म्हणतो त्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी बनत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 
वास्तविक बचत ही महिलांची मूळ प्रवर्ति, मात्र ही बचत कधी पदराच्या गाठीच्या स्वरूपात, तर कधी डाळी डुळी, उतरंडीच्या कुठल्यातरी अन्नधान्याच्या कप्प्यात पडलेली असायची. ती घरच्याच अडचणीच्या वेळी बाहेर निघायची. मात्र अशा बचतीचा कुटुंबाला आधार नेहमीच होत आला आहे. अशा बचतीला बँकांच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्याचा विचार जागतिक पातळीवर सुरू होऊन तो सर्वप्रथम बांगलादेशात डॉ. मोहम्मद युनूस या नोबेल पुरस्कार विजेत्यांनी रुजवला. त्यानंतर हा विचार भारतातील महिलांच्या बाबतीत बरोबर उपयोगात आणता येऊ शकतो या विचाराने 1991 पासून भारतात सुद्धा बचत गट चळवळीला प्रारंभ झाला. भारताच्या ग्रामीण भागाचं आर्थिक चित्र हे सावकारी पाशातून पुढे जातं साकारत. त्यामुळे सावकाराच्या जोखडातून कुटुंबाची सोडवणूक करायची असेल तर महिलांना आर्थिक उत्पन्नाच्या साधनांची जोड देऊन आर्थिक सक्षम केलं पाहिजे हा विचार पुढे आला आणि त्यातूनच भारताच्या वेगवेगळ्या राज्यात महिला बचत गटांची एक स्वतंत्र चळवळ उभी राहिली. त्यातून आर्थिक समृद्धीची वाटचाल सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. आज देशातल्या अनेक प्रदेशातील बचत गटांनी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ख्याती मिळवली आहे. महाराष्ट्रातले बचत गट देखील त्यात मागे नाहीत. बचत गट म्हणजेच आर्थिक स्वावलंबन, आर्थिक साक्षरता, आर्थिक आत्मनिर्भरता ,उद्योजकता आणि आपल्यातील सुप्त गुणांना वाव ,संधी देत आपण आपल्यासह समाज आणि देशाच्या उन्नती मध्ये, देशाच्या एकंदरीत उत्पन्न वाढीमध्ये ,दरडोई उत्पन्नात भर टाकत बचत गट दैदीप्यमान कार्य करत आहेत. यातल्या काही बचत गटाची उदाहरणे तर खूपच महत्त्वपूर्ण योगदान देण्यारी आहेत. महाराष्ट्रातल्याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडीतील मानकर वाडीतल्या केवळ 400 लोकसंख्या असणाऱ्या गावाने बचतगटांच्या माध्यमातून संपूर्ण कायापालट करून दाखवला, तर अक्कलकोट तालुक्यातल्या जीवन ज्योती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादित करून त्यांचं वितरण व उत्पादन संपूर्ण राज्यभर नव्हे तर आता देशातल्या अनेक प्रदेशात सुरू केलेला आहे. त्यात हिमाचल प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम, छत्तीसगड, बिहार सारख्या राज्यात या महिला बचत गटांनी आपली उत्पादन केंद्रे सुरू केली आहेत. खानदेशातील महिला बचत गटांनी तर मक्याच्या पिठापासून सुंदर कलाकृती तयार करणे आणि साता समुद्रा पार भारतमाता अर्थात गोधडी बचत गटाच्या माध्यमातूनच पोहोचवली आहे. शिवाय लातूर सारख्या शहरात सुद्धा महिला बचत गटाच्या माध्यमातून अतिशय निम्न स्वरूपाचं कार्य असणाऱ्या सेफ्टी टॅंक स्वच्छता करण्यासाठी यांत्रिक उपकरण उपलब्ध करून दिली आहेत. म्हणजेच नेहमी कुरडया- पापड्या - मसाले यासारख्या पारंपारिक वस्तूच्या उत्पादनात अडकलेली महिला आता बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक कमावत आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून महिला खरोखरच सक्षम होत आहेत का? आर्थिक स्वावलंबी होत आहेत का? याबाबतीत निकिता नावऱिया आणि डॉ. प्रीती रॉय यांनी संशोधन केला आहे. त्यातून महिला बचत गटामध्ये सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या महिलांचा वयोगट हा 30 ते 40 मधील आहे. यावरून आपण  युवती वैवाहिक जीवनात प्रवेश करून वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करताना बचत गटाच्या माध्यमातून जोडली जाते हे सिद्ध होते. त्यामुळे गृहिणी, नवउद्योजक आणि रोजगार करणारी महिला सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून जोडली जाते, हे महिलांच्या होणाऱ्या आर्थिक  सक्षमीकरणासोबत स्वावलंबनाच्या बाबतीत देखील उल्लेखनीय कार्य म्हणावे लागेल. वास्तविक पाहता महिला बचत गटांना आर्थिक ताकद पाठबळ देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून होत आहे. बचत गटांना त्यांनी बचत केलेल्या रकमेपेक्षाही कितीतरी पटीने अधिक आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून, बँकांच्या मध्यस्थीतून उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे महिलांचा सहभाग आणि महिलांची परस्पर विश्वासार्हता अधिक दृढ होत आहे. काही महिलांनी तर डॉ. प्रीती राय यांना दिलेल्या उत्तरात बचत गटाने आमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे मान्य केले आहे. म्हणजेच बचत गट ही केवळ शिकून सवरून पदवी ग्रहण केलेली महिला ही जशी आर्थिक सक्षम नसते तसं बचत गट सुरू करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त होत नाही तर त्यासाठी महिलांनी महिलांवर ठेवलेल्या विश्वासाच्या बळावर आणि दिलेल्या हरतऱ्हेचे योगदानामुळं बचत गटांना यश प्राप्त होत आहे. शिवाय करोडो रुपयांची उलाढाल शासकीय माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या प्रदर्शने, शिबिरे, विक्रीचे स्टॉल या माध्यमातून होतेय. यातून महिला आर्थिक स्वावलंबी बनत असल्याचे आशादायी चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. आता ग्रामीण महिला सुद्धा घरातील आर्थिक व्यवहारात पुरुषांच्याही पुढे जाऊन आपले विचार मांडत असल्याचं चित्र ग्रामीण भागातून पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातल्या महिलांचे शिक्षण जरी कमी असले तरी त्या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर निश्चित बनल्या आहेत अस आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने निश्चितपणे सांगू शकतो.
डॉ वनिता आग्रे पटवारी 
लातूर 

प्रत्येकाला शुभ्रा हवी

 मानवी अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात उमटणाऱ्या अल्पकालीन आणि दीर्घकालिक घटनांचे सात पडसाद हे त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतात आणि हेच प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनाला कधी उच्च पातळीवर तर घेऊन जातात तर कधी फरफटत घेऊन जातात. हेच उन्हातलं चांदणं या नाटकातून आम्हाला पाहायला मिळतं. तसं पाहता ज्येष्ठ नाट्यकर्मी, कलावंत अॅड शैलेश गोजमगुंडे यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं उन्हातलं चांदणं हे नाटक नुकतच पाहण्यात आल त्याच्या विषयी चार शब्द. नाटकातून शरद नावाच्या भावनाशील कवीचं (तसं कवी हे भावनिकच असतात म्हणा) संसारिक जीवन त्या संसारिक जीवनातली जोडीदारीन पांढरपेशा समाजात वावरणारी शरद ची बायको तारा जी नको तितका हव्यास बाळगून नवऱ्याशी अर्थात कवी शरद यांच्याशी शुल्लक  गोष्टीवरून टोकापर्यंत जाते आणि त्यातच हळव्या मनाचा शरद कुठेतरी दुखावला जात असतो. 
नाटकातील छोट्या छोट्या घटना आणि प्रसंगावरून  कवी शरद हा चित्रविचित्र अवस्थेत सापडून पत्नीच्या मानसिक छळवादाला कंटाळून कुठेतरी स्वप्नांच्या दुनियेत हरवून ते कधीही न मिळालेले प्रेम शुभ्राच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न ताराच्या नकारात्मक वर्तनाच्या अनुषंगाने त्याच्या आंतरपटलावर निर्माण झालेला असतो. 
अंतर्मनावर बिंबलेली कवी मनाची भावनिकता ताराच्या अंगी लवलेशही दिसून येत नाही. उलट भोळ्या शरदला ताराच हे वर्तन शुभ्राच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतं. दुसरीकडे शुभ्राला शरदच्या कविता अत्याधिक आवडतात आणि ती त्याला अधिकाधिक कविता लिहिण्याला प्रेरित करते. दोन व्यक्ती रेखांमध्ये एक शरदच्या कविता बनून कवितेत उतरते तर दुसरी तारा कवितेचा दुष्वास करते,शरदच्या कविता फाडून टाकते. ताराच हे वर्तन शरदच्या अंतर्मनाला चिरफाटून टाकतं तो अंतर्मनातून हेलावून जातो आणि जिला शुभ्रा समजून विवाहपूर्वी प्रेम करत होता तोच विवाह नंतर ताराचा तो प्रचंड तिरस्कार करू लागतो. ताराचा तिरस्कार करताना तो शुभ्राच्या प्रेमात पडला आणि शेवटी शुभ्रा शिवाय त्याची कविता आणि त्याचे जीवन अधुरं वाटू लागलं. 
त्याच्या या अशा वागण्याचा ताराच्या मनावर परिणाम झाला आणि ती या बदला  संदर्भात गंभीर विचार करते. या दोघांच्या संसारामध्ये असणारा तिसरा घटक  सायक्राॅटिस्ट  ताराला आणि शरदला त्यांच्यात निर्माण होणाऱ्या दुराव्याबद्दल वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देतो. मात्र दोघेही आपापल्या बाजूने योग्य असल्याचं भासवतात. तरीदेखील या ठिकाणी एक गोष्ट कायम लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे पती-पत्नीमध्ये होणारी भांडणं ही जर अल्पकालीन असतील  तर आपल्याला या नाटकाचा शेवट वेगळा पाहायला मिळाला असता परंतु शरदच्या मनात आपल्याविषयी प्रेमळ भावना निर्माण व्हाव्यात यासाठी शुभ्रा बनणारी तारा शेवटी स्वतःला संपवून शुभ्रा म्हणून राहण्यासाठी सुद्धा तयार होते. मात्र ताराच्या मनात असलेली पांढऱपेशी समाजातले हव्यास शुभ्रा बनली तरी गेलेले नसतात. इथेच तिची चूक होते आणि शरद शेवटी ताराला संपवतो. आणि शुभ्राच्या मिठीत बेधुंद कविता करत राहतो.
या नाटकाच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शकांनी आधुनिक काळातील कुटुंब व्यवस्थेत  टोकाच्या भूमिकेतून ज्या समस्या आणि प्रश्नांचा डोंगर समाजापुढे उभा राहतोय त्याची झलक दाखवण्यात यशस्वी झालेले आहेत. नाटकात इनमिन चार पात्र परंतु चारही पात्र तेवढ्याच तोलामोलाची तेवढ्याच समर्थपणे आणि एकमेकांच्या पात्राला अधिकाधिक खुलवणारी दिसून येतात. शुभ्रा ही कल्पना अर्थात भासमानच आहे. 
तारा हे वास्तव आहे. सुरुवातीला कठोर व व्यावहारीक असलेल्या ताराला, शरद मनोरुग्ण झाल्यानंतर व जयंत ने जाणवून दिल्यानंतर त्याचं प्रेम समजतं. तिचंही शरदवर प्रेम आहेच. मात्र व्यावहारीक अपेक्षांच्या ओझ्याखाली ते लपलेलं होतं. एका भावनिक क्षणी तिला स्वतःचीच घृणा  येते. ती शरदला ते बोलून दाखवते. मात्र शरदच्या मनःपटलावरुन तारा कधीच गायब झालेली असते. तिची साधी आठवण सुद्धा त्याला अस्वस्थ करुन जाते.हीच गोष्ट भावनेच्या भर‍ात तारा विसरते आणि ती शरदला मी तारा असल्याचं सांगते. इथेच ताराचा घात होतो. आणि ताराला शरद संपवतो.
 केवळ दोन अंकात नाटक संपत परंतु बदललेल्या स्थितीच भान मात्र रसिकांच्या मनात खोलवर बिंबवतं. 
शुभ्राच अस्तित्व हे जरी भासमान असलं तरी ताराच्या टोकाच्या भूमिकेमुळे ते वास्तववादी दिसतं म्हणून तारा स्वतःचा अस्तित्व संपवून शरदच्या जीवनात पुन्हा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करते परंतु त्यासाठी बराच वेळ गेलेला असतो म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हे महत्त्वाचे ठरतात. 
लेखक दिग्दर्शक :अॅड शैलेश गोजमुंडे
प्रकाश योजना: सुधीर राजहंस
 नेपथ्य :अॅड बालाजी मेहेत्रे निशिकांत जोशी 
संगीत :तनमय रोडगे विनायक राठोड निलेश पाठक रंगभूषा /वेशभूषा :सचिन उपाध्ये स्मिता उपाध्ये आणि कलाकार :प्रा. नवलाजी जाधव डॉ. स्वप्नाजा यादव, अभिषेक शिंदे, प्रज्ञा मुळे, पृथ्वी सिंह चव्हाण, आलोक वलाकट्टे आणि अड शैलेश गोजमगुंडे. 

Tuesday, 9 May 2023

वर्चस्वाची लढाई राजीनामा नाट्यातून

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात आणि देशभरात जणूकाही भूकंप झाला अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र खा. शरद पवारांनी याहीपेक्षा काहीतरी वेगळं घडवून आणण्यासाठी तर हा राजीनामा दिला नाही ना ही शंका सहजच मनाला चाटून जाते. कारण शरद पवार यांनी आतापर्यंत केलेल्या कोणत्याही गोष्टींच्या पाठीमागं निश्चितपणे काहीतरी व्यापक स्वरूपातला विचार असतो. म्हणून राजीनामा नाट्या बाबतीत, हो याला नाट्यच म्हणावं लागेल. कारण नंतर कार्यकर्ते आणि नेत्यांच्या दबावाला बळी पडून राजीनामा मागे घेत अध्यक्षस्थानी विराजमान झाले. या राजीनामाला अनेक कंगोरे दिसून येतात. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे कसंब असणार्‍या मा. खा. श्री शरद पवारांनी यावेळी देखील एकाच झटक्यात अनेकांना गारद केले आहे आणि पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आपणच आहोत हे दाखवून देण्यात ते यशस्वी ठरले. 
एकीकडे या राजीनामा नाट्याला जी अनेक कंगोरे आहेत त्यात मा. आ. अजित पवार  बीजेपीच्या वाटेवर ही टॅगलाईन मागच्या काही दिवसापासून माध्यमांच्या केंद्रस्थानी होती. तर राज्य सरकारने  सातत्याने  राष्ट्रवादीवर कुरगुडी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आपल्याकडे सगळ्यांच्या नजरा वळवण्यासाठी  हा अचानक घडवून आणलेला भूकंप होता. त्यामुळे अजित पवारांचा भाजप रस्ता आपोआपच बंद झाला. 
 दुसरीकडे राष्ट्रीय राजकारणात बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशपातळीवर काही वेगळ्याच हालचाली पाहायला मिळत होत्या. नितीश  कुमार यांनी लालू यादव यांचे चिरंजीव आणि मुलायम सिंग यांचे चिरंजीवांना हाताशी धरून राष्ट्रीय राजकारणात आपला जम बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी घेतलेल्या भेटीने सहाजिकच शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणातून आपण बाहेर फेकले जातोय की काय असे वाटत असावे. कारण जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचे सरकार बिहारमध्ये होतं तोपर्यंत विरोधकांचे नेते म्हणून शरद पवार हे अग्रभागी होते. बिहार मधली सत्ता समीकरणे बदलली आणि नितीश कुमार उघडपणे विरोधकांच्या तंबूतील मुख्य आधारस्तंभ बनले. शिवाय त्यांनी ताबडतोब राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीला सक्षम विरोधक म्हणून नेतृत्व देण्याच्या हालचाली सुरू केल्या. यातूनच शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणात नितेश कुमार यांच्या आगमनानंतर आपला फारसा प्रभाव पडत नसल्याचं दिसून येत होतं होतं म्हणून त्यांनी राजीनामा नाट्य घडून राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांना आपणच पक्षाचा अध्यक्ष राहावा अशी मनधरणी करायला भाग पाडले. म्हणूनच शरद पवारांनी आपल्या राजीनामा नाट्यातून आपलं वर्चस्व पुन्हा कायम राखण्याची किमया साधली आहे. 

Thursday, 13 April 2023

व्यथा वेदनांच्या

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचा फटका सर्वाधिक कोणत्या क्षेत्रावर होत असेल तर तो शेती क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे या क्षेत्रावर होणारे नैसर्गिक  रूपातील अवकाळी चे हल्ले असतील, गारपीट, किंवा अतिवृष्टी अशा एक ना दोन असंख्य  सातत्यपूर्ण येणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या वेदना तीव्र होत असून, त्यांच्या व्यथा कोणाकोणापुढे मांडायच्या आणि आपला फाटका संसार नेताना  नेटाने रेटत राहायचं, हा शेतकऱ्यांचा दुःखदायी प्रश्न होय. 
    जागतिकीकरण भांडवल आणि खाजगीकरण या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची पारंपारिक जीवनशैली बदलून त्या ठिकाणी भांडवल प्रधान व्यवस्था अस्तित्वात आणल्याचा परिणाम, शून्य भांडवल आधारित पारंपारिक शेतीच कंबर्ड मोडलं, परिणामी शेतकऱ्याला एकीकडे भांडवलशाही शेतीच आकर्षण आणि दुसरीकडे पारंपारिक शेतीतून मुक्त झालेला असुरी आनंद फार काळ टिकणारा नाही हे आता लक्षात येत आहे. कारण भांडवलशाही पद्धतीत गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात भारतीय शेतीतील उत्पादकता उत्पन्न देत नाहीये. परिणामी बुडते भांडवल हा भारतीय शेतीचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवावर उठून त्याला आत्महत्येस प्रवर्त करत आहे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये असणार स्वावलंबनाचे तंत्र आता पूर्णपणे भांडवलशाही पद्धतीमुळे अर्थ तत्त्वावर आधारित असल्याने प्रत्येक लहान कामासाठी त्याला पैसे मोजावे लागतात. या सर्वांचा एकंदरीत परिणाम त्याने आपल्या हक्काच्या परंपरा ज्या कसल्याही भांडवलाच्या आवश्यकते शिवाय चालत होत्या त्या मोडीत काढून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे दिसून येतं.